My Blog List

Tuesday, 19 July 2016

बस्स! त्या क्षणानंतर माझ्या गुरूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली - "अनुभव’’ !!!

आज गुरूपौर्णिमेची धुम सकाळपासूनच सुरू झाली. आमच्या परिसरातील साई मंदिरांमध्ये पहाटे 7 वाजल्यापासूनच अखंड पारायण सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रूपवर गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. आजच्या दिवशी सगळेजण आपल्या शाळेतल्या, क्लासेसमधल्या, कंपनीतल्या गुरूंना भेटून त्यांचा आशिर्वाद घेतात. बरेच जण मला "प्रमिला, तुझा गुरू कोण?' असं गमतीनं विचारतात. मी आयुष्यात कुणाच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाले? कुणाचं शिष्यत्व पत्करलंय? मला ज्यानं घडवलं, तो कोण आहे? हे सारं जाणून घेण्यातही अनेकजणांना रस असतो; आणि वर्षभर कुणाच्या लक्षात राहत नाही परंतू आजच्या दिवशी मात्र गुरूंना एक तरी फोन करूया, असेही नुमने असतात आपल्या आजुबाजुला... पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी कानावरून गेलेलं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य मला आठवतं, ‘’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...!’’.

कारण मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड होती, मग त्या गोष्टी करणं मला जमत नसल्या तरी मी त्या करायचीच...हे वेड होतं माझं. त्यामूळे अनेक टप्प्प्यावर मला भेटलेल्या वेगवेगळ्या माणसांनी मला घडवलंय...शिकवलंय...!! मग मला ते सातवीत असताना पोळ्या बनवायच्या पण लाटता येत नव्हत्या, हे पाहून आईने पोळ्या कशा लाटायच्या हे शिकवणं असो किंवा शाळेत असताना श्रोत्यांसमोर बोलायचं कसं माहित नसुनही वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असे माझे ठरल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन असो...किंवा आताचच सांगायचं झालं तर माध्यम क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्या लिखानावर प्रभूत्व कसं करावं इथपासून ते नव-नविन गोष्टी करण्यात अनेक दिग्गजांचा मोठा वाटा आहे. ज्याचा हिशेब मांडायचा झाल्यास पसारा उदंड होईल. त्यातल्या प्रत्येकाचीच भूमिका माझ्याकरिता द्रोणाचार्यांची होती, असं नाही; पण मी मात्र एकलव्यासारखी तन्मयतेनं सारं वेचत आल, साठवत आल. खरं सांगायचं तर आयुष्यात अनुभवासारखा गुरू नाही, असं मला वाटतं. कुठलाही गुरू म्हणा, शिक्षक म्हणा "थिअरी आधी; मग प्रॅक्‍टिकल' असा मार्ग स्वीकारतो; पण अनुभव हा एकमेक गुरू असा आहे, जो आधी प्रॅक्‍टिकल देतो. त्यामुळं थिअरी तुम्हाला घोकावीच लागत नाही, तर ती मेंदूवर कायमची कोरलीच जाते. माझ्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून मी काही ना काही शिकत आली. या घटनाच आपल्याला काही ना काही शिकवित असतात. गरज असते ती फक्त त्या घटना जाणून घेण्याच्या आपल्यातल्या कुवतीची...उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या शाळेत संचालिका सुलभा कांबळे मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यायाम सत्रानंतर ठराविक ग्रूप्स करून त्यांच्याकडून वृत्तपत्र वाचन हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवित असत. काही हूशार मंडळी छान वाचन करायची...सगळ्यांसमोर असं ठणकेदार आवाजात, हातात मोठ्या स्टाईलने पेपर घेऊन त्यातल्या बातम्या वाचून दाखवणं हे पाहून  मला मात्र मोह अनावर झाला. माझे सगळे मित्र-मैत्रीणी मस्त छान वाचन करून आपली वट वाढवित होते. मग मी पण संधी साधली. त्यावेळी ते माझ्यासाठी स्वप्न होतं. एकदा तरी असं सगळ्यांसमोर पेपर वाचून काढयचा म्हणून कधी नव्हे ते आमच्या घरात मराठी वृत्तपत्र आले आणि मी जवळपास एक आठवडाभर वृत्तपत्र वाचनाचा सराव करू लागले. पण बातमीचे वाचन कसं करायचं हे माहित नव्हतं मग घरात टि.व्ही. न्यूज चॅनेल लावून बाहूल्यांसारख्या दिसणाऱ्या अॅंकरना पाहून त्या बातम्या कशा सांगतात, यावर फोकस करू लागले. मग त्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या स्वरात बातम्या वाचन करून आठवडा भर मी काही ते वेड सोडलं नाही आणि आला तो स्वप्नपुर्तीचा दिवस. समोर इतकी मोठी मंडळी पाहून सुरवातीला थोडी डगमगली..पण आपल्याला हे करयाचंच आहे हे ठाम होतं मनात. त्यामुळे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सुसाट बातमीपत्र वाचून काढले. वृत्तपत्र वाचताना तो वेगळाच आत्मविश्वास अगदी रुबाबात डोलत होत. हा छोटासा प्रसंग मला खूप काही शिकवून जाणारा ठरला. त्यानं मला आयुष्यात दोन अनमोल गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे, आयुष्यात आनंद, सुख शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नसते. आनंदाचं मूळ तुमच्या आसपास असतं; पण भोवतालच्या अनेक हव्या-नकोशा गरजांच्या गर्दीत ते एकाग्र होऊन शोधावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेकदा तुम्हाला आयुष्यात जे हवंय, जे साध्य करायचंय, त्याच्या अन्‌ तुमच्या दरम्यान बऱ्याच नकोशा त्रासदायक गोष्टी येत असतात. अशा वेळी त्यांनी विचलित होऊन साधना किंवा ध्यासच सोडण्याऐवजी किंवा त्या गोष्टींच्या नावे उगाच त्रागा करण्याऐवजी तुमच्या ध्येयावर जास्त "फोकस' केलंत तर नको असलेल्या त्या गोष्टींचं अस्तित्व तुमच्यासाठी धूसर होऊन जातं.  बस्स! त्या क्षणानंतर माझ्या अगणित गुरूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली - "अनुभव’’ !!!

Tuesday, 12 July 2016

‘विठ्ठल-अल्लाह’चे ‘लोकसंगीत प्लस सुफी’ स्टाईलचे हे गाणे ऐकाच एकदा...


खूप दिवसांनी ‘हिंदू-मुस्लिम’ या विषयावर लिहीण्याचा विचार करीत होते. पण ‘हिंदू-मुस्लिम’ यात फक्त दोन शब्द जरी असले तरी यात अनेक धागे-दोरे, घटना, भावना दडलेले असल्याने लिहू की नको लिहू हा विचार करीत होते. पण अखेर ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातील ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने मला लिहीतं केलंच. सध्या सगळीकडे सुरू असलेल्या पंढऱीची वारी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या ‘जय हरी विठ्ठल-अल्लाह हू अकबर’ या गाण्याने जुलै महिन्याचे वैशिष्ट्य आणखीनच सुंदर करून ठेवले. हे गाणे जेव्हा मी युट्यूबवर ऐकले तेव्हा अक्षरशः अंगावर काटे आले.
मला संगीतातलं फारसं काही कळंत नसलं तरी मात्र हे गाणं मला कळालं. एकीकडे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले गायक नंदेश उमप यांच्या रांगड्या आवाजात विठ्ठलाला दिलेली साद....तर दुसरीकडे संगीततल्या डेप्थमध्ये जाऊन अल्लाहला पुकारताना बॉलिवूडचे गायक शबाब साबरी यांचा सुफी सरगम...काय फ्यूजन आहे हे!!!! मित्रांनो आजपर्यंत ‘हिंदू-मुस्लिम’ हा विषयंच जरी कोणाकडे काढला तर ज्याला ओ का ठो कळात नाही  ते ही आज बाबरी मशीद प्रकरण, हिंदुस्थान-पाकीस्तान, आंतकवाद, मुस्लिमांची असुरक्षितता, हिंदू मंदिरांच्या जागी मुस्लिमांच्या मशिदीचे आक्रमण यासारख्या अनेक विषयांवर तासनतास बोलू लागले आहेत. पण अशा मंडळींच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर यांनी ‘डिस्को सन्या’ या फिल्ममधून हे गाणे आणले आहे.  

काय कसली शेंडी...अन काय कसली दाढी...
काय कसला भगवा...अन काय कसला हिरवा...
कायको डाली टोपी अन कायको पेहना फेटा...
माणूसकी हाच धर्म सुनले मेरे बेटा...
गाण्याच्या सुरवातीच्या या चार ओळीच पुरेश्या आहेत हे गाणे समजून घेण्यासाठी....हिंदू म्हणून ओळखावे म्हणून लोक शेंडी ठेवतात, तर मुस्लिमांची ओळख त्यांच्या दाढीवरून करतात. भगव्या रंगाची जोड हिंदु धर्माशी केली जाते तर हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांची निशाणी बनते. पण तुम्ही दाढी केली काय शेंडी ठेवली काय...माणसांची ओळख ही त्याच्यातल्या माणूसकीनेच होते...तुम्ही भगवे झेंडे मिरवले काय की हिरवे....पण तुमच्यातल्या माणूसकीच्या रंगापुढे भगवे-हिरवे रंग फिके पडतील, अशाच काहीश्या भावना मला या कडव्यातून मिळाल्या. त्यामूळे तुम्ही हिंदू असाल किंवा मुस्लिम....पण हे हातासारशी गाणे ऐकाच! संगीत नव्हे तर वेगवेगळ्या भावनिक स्थितीमध्ये माणूसकीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे वेगवेगळे रूप दाखविण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला.  या गाण्यात हे कडवे प्रख्यात बालकलाकार पार्थ भालेराव आणि सुप्रसिद्ध अभिनेता संजय खापरे यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात पार्थ भालेराव संजय खापरे याच्या डोक्यावर दगड मारतो, या प्रसंगातून हिदूं-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या जोरदार कानशिलात बसविण्यात दिग्दर्शक नियाज मुजावर येथे यशस्वी होतात.

भूखे पेट सुखी रोटी पानी तो दिला दे अल्लाह...
हक्काचं मागूनी थोडी तरी द्या हो कृपा....
अल्लाह तु, मौला तु, माझ्या मुखी तुझे नाव...
या दोन ओळी गाताना नंदेश उमप व शबाब साबरी या दोघांच्या स्वरांची उत्कटता निर्गुण, निराकार अल्ला, ईश्वराला स्वरांच्या माध्यमातून शोधतात. दोन वेळचे जेवण मिळावे एवढाही हक्क आज समाजात अनेक गरिबांना मिळत नाही, त्या भूकेला कोणताही धर्म नसतो. भूकेसाठीच्या या अमेझिंग, विलक्षण शब्दात जेव्हा पार्थ भालेराव रस्त्यावरच्या भूकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू देतो, ही भूक मिटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम एक झाले तर कोणताच धर्मीय हा भूकेला राहणार नाही असा संदेश या गाण्यातून दिला आहे. जगातल्या साऱ्याच प्रामाणिक, सच्च्या आणि अस्सल भावनेला समर्पित हे गाणे आहे. या गाण्यात दाखविलेला अजून एक प्रसंग माझ्या मनाला भावला तो म्हणजे जेव्हा पार्थ भालेराव जेवणापुर्वी ‘ओम नमः शिवाय..फादर सन..बिस्मील्ला आमीर’ या मंत्राचा जप करतो. काय कमाल कल्पना आहे हे मंत्र बनविण्याची. म्हणजे हिंदुंमध्ये ‘वदनी कवळ घेता’ हे मंत्र म्हटले काय....आणि मुस्लिमांमध्ये कुराण वाचन केले काय....पण सर्व धर्म समान मानून समाजात असलेली माणूसकीची भूक आज प्रत्येकाने मिटवली पाहीजे, असा संदेश नकळत या गाण्यात दिला आहे. याच ईश्वरीय भावनेचा एक कोपरा निखळ मैत्री. अशाच निखळ मैत्रीच्या भावनेला समर्पित ‘जय हरि विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ हे गाणे एक वेगळी उंची गाठणार आणि दाद द्यायला भाग पाडणार आहे. गाण्याच्या शेवटी धर्माने मुस्लिम असलेले गायक शबाब साबरी यांच्या सुरेल आवाजातून कधी विठ्ठलाला साद घालतात...तर हिंदु असलेले लोहशाहीर नंदेश उमप अल्लाहला पुकारतात...काय निखळ क्षण वाटतात ते क्षण...दोन्ही धर्माचे गायक एकमेकांच्या धर्मातील देवतांचे नावे घेतात...आणि जेव्हा हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दोघेही ‘जय हरी विठ्ठल...अल्लाह हू अकबर’ नामाचा जप करतात...तेव्हाचे संगीत अगदी पवित्र वाटू लागतात.

मी बीड सारख्या जिल्ह्यात जन्मली आहे...वाढली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक कोपऱ्यातील गाव हे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या एकोप्यातने नांदत आहे. त्यातीलच एका गावात माझे घर आहे. त्यामूळे ‘जय हरि विठ्ठल अल्लाह हू अकबर’ हे गाणे मला खूप भावते. हे गाणे सगळ्याच बाजूने अफाट आहे. गेल्या अनेक वर्षाच्या चित्रपट इतिहासात असं गाणं नव्याने आलंय म्हणजे हिंदु-मुस्लिम या दोन्ही धर्मातील गायकांचा सुरेल वापर, पार्थ-संजय यांच्यातील संघर्षाचा वापर, रस्त्यावरील भुकेल्या मुलांचा वापर, परीसराचा वापर आणि हे कथानाक....या सर्वासाठी संगीतकार-निर्माते सचिन पुरोहित, अभिजीत कवठाळकर, दिग्दर्शक नियाज मुजावर यांना हजार वेळा सलाम. एवड्या सुंदर पद्धतीने ही धर्मव्यवस्था,  समाजव्यवस्था या सर्वांना चपखलपणे थप्पड लगावलेली आहे. अप्रतिम...त्यामूळे सर्वांनी तुमच्या कामातून थोडा वेळ काढा हे ‘जय हरि विठ्ठल, अल्लाह हू अकबर’ हे गाणे ऐकाच एकदा....माणूसकीचे स्वर अनुभवण्यासाठी...

गाणे ऐकण्यासाठी लिंक सोबत जोडत आहे. https://www.youtube.com/watch?v=7qZirK9ZdoU


गीत- नियाज मुजावर
संगीत-सचिन पुरोहित-अभिजीत कवठाळकर
स्वर-लोकशाहीर नंदेश उमप व गायक शबाब साबरी
गीतप्रकार-इंडोफ्यूजन